सहस्र अभंगावली

सहस्र अभंगावली
ज्ञानेश्र्वर महारांजाचे अप्रकाशित अभंग मिळविण्यास ज्या साहित्तिकांचे व ग्रंथकारांचे लिखाणांमुळे सहकार्य झाले त्या सर्वांचे शतश आभार.

Thursday, 9 April 2015

प्रकरण – २ श्री गुरूगौरव

प्रकरण – २
श्री गुरूगौरव

(८)
प्रथम नमूं तो गुरूदेवो ।जेथे निमालें भवाभावो ।अनादि स्वरूप स्वयमेवो ।तो आदिदेवो नमियेला ।।१।। जें हें मनाचें पै मूळ।जेथे द्वैताचा दुष्काळ ।स्वरूपीं स्वरूप केवळ ।तो अढळ नमियेला।।२।। हें जग जेणेंसि संचले।परी कोठेंही नाही नाडले Iजेवीं हालिया अंतराळें ।तैंसा सर्व मेळे असतांही।।३।। ऐसा सर्वां अतीत ।परी ऐसा जगभरीत ।कनक कांकणी रहात ।तैसा अधिक्रुत निरंतर।४।। जो मनबुध्दिसी अगोचर । तोचि झाला चराचर ।हा आत्मसुखाचा विचार ।अपविस्तार केला जेणे।।५।। तो जाणावा ज्ञप्तिरूप। निव्रुत्तिनाथांचे स्वरूप ।एकदंत नामे ज्ञानदीप । बोधस्वरूप ज्ञानदेवा ।।६।।
(९)
गुरू हा संतकुळींचा राजा ।गुरू हा प्राणविसांवा माझा ।गुरूवीणदेव दुजा ।पाहतां नाहीं त्रिलोकीं ।।१।।गुरूहा सुखाचा सागरू ।गुरू हा प्रेमाचा आगरू ।गुरू हा धैर्याचा डोंगरू ।कदाकाळीं डळमळींना ।।२।। गुरू वैराग्याचें मूळ ।गुरू हा परब्रह्म केवळ ।गुरू सोडवी तात्काळ ।गांठ लिंगदेहाची ।।।३।। गरू हा साधकाशी साह्य ।गुरू हा भक्तालागीं माय । गुरू हा कामधेनु गाय।भक्तांवरीं दुभतसे ।।४।। गुरू घाली ज्ञानांजन ।गुरू दाखवी निजधन ।गुरू सौभाग्य देऊन ।साधुबोध नांदवी।।५।। गुरू मुक्तींचें मंडन ।गुरू दुष्टांचें दंडन। गुरू पापांचें खंडन ।ना ना परी वारितसे ।।६।। काया काशीं गुरू उपदेशी ।तारक मंत्र दिला आम्हांशी ।बापरखुमादेविवराशी । ध्यान मानसीं लागलें ।।७।।

(१०)
गुरूज्ञान नाहीं ज्यासी ।तरूणोपाय नाहीं नाहीं त्याशी ।तो नावडे ऋषीकेशी ।व्यर्थ जन्मासी तो आला ।।१।।देव धर्म नेणे कांहीं । धरी प्रपंचाची सोई । त्या कोठेंही थार नाहीं ।हे वेद बोलिलासे।।२।।कृष्णकथा जो नायके ।राम नाम न म्हणे मुखें ।तया सोस कोटी दुःखें ।जन्म योनी भोगु लागेल।।३।।ज्ञानदेवीं अभ्यास केला ।सर्व संसार हा तारिला। रामकृष्णें भवपाश तोडिला ।सर्व पितरांसहित ।।४।।

(११)
नित्य धर्म नामपाट ।तेंचि वैकुंटींची वाट ।गुरूभजनीं जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ।।१।।धन्य घन्य त्याचा वंश ।घन्य तो आला जन्मास ।तयाजवळी ह्रषीकेश ।सर्वकाळ नांदतु असे ।।२।।रामकृष्णस्मरण जप ।तेंची तयाचें अमूप तप ।तो वास करील कोटी कल्प । वैकुंठपीठ नगरीशी ।।३।। ज्ञानदेवीं जप केला ।हरि समाधीसी साधिला ।हरिमंत्रें प्रोक्षिला ।सर्व संसार निर्घारें।।४।।
(१२)
आदिनाथें बीज सांगितलें कानी ।सोहं हे शिराणी कैवल्यची।।१।। मच्छेंद्र,गोरक्ष पावले या सुखा ।उजळिल्या आशंका ज्ञानाचिया।।२।। निवृत्तिनें गूज स्वतंत्र ओतिलें ।अपार पावले सिध्दपंथें ।।३।। सोहं या मंत्राचा वेदाचा गव्हर । म्हणे ज्ञानेश्र्वर राजयोगी ।।४।।
(१३)
चित्रीं सूर्यबिंब काढूं येईल चांग । प्रकाशाचें अंग काढितां नयें ।।१।। संन्यासाचें सोंग आणूं येइल सांग । अनुभवाचें अंग दावितां नयें।।२।। ब्रह्मज्ञान मुखें बोलूं येइल सांग । वैराग्याचें अंग आणितां नयें ।।३।। ज्ञानदेव म्हणे गुरूकृपा सांग । तरिच हें भाग्य येइल हातां ।।४।।
******************************************************


No comments:

Post a Comment